कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा, स्वत:ची काळजी घ्या


‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद

नागपूर : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत अधिक झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गंभीर होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने कोरोना त्रिसूत्रीचे म्हणजेच मास्क, सॉनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा आणि स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. उदय नार्लावार आणि जनरल फिजिशियन व मधुमेह तज्ञ डॉ. नितीन गुप्ता यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. आजचा विषय ‘वर्तमान परिस्थितीत कोरोनावर प्रतिबंध आणि नियंत्रण’ असा होता. या विषयावर संवाद साधतानाच त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

डॉ. उदय नार्लावार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह आहे. यात बाधितांचा मृत्यूदरही जास्त आहे. अशा वेळेस नागरिकांनी बेजबाबदारीने न वागता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तसेच कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरस आपले स्वरूप बदलवत आहे. ९० टक्के बाधितांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. परंतू संसर्ग वाढत जाउन जीवाला धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे प्रत्येकानी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पुढे ते म्हणाले, लसीकरण अधिक गतीने झाले तर पुढील एक वर्षात कोरोनावर नियंत्रण मिळविता येउ शकतो. कोणत्याही विषाणुवर लस हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस मिळाल्यास कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी करण्यात मदत मिळू शकते असे ते म्हणाले. मध्यंतरीच्या काळात नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे फेब्रुवारी पासून रुग्णसंख्येत वाढ झाली. लग्न समारंभ, विविध सामाजीक कार्यक्रम, ग्रामपंचायत निवडणूक यातील गर्दी कोरोनाला कारणीभूत ठरली असेही ते म्हणाले.

डॉ. नितीन गुप्ता म्हणाले, कोरोना चाचणी सकारात्मक असेल आणि काही सौम्य अथवा गंभीर लक्षणे असल्यास सी.टी. स्कॅन करणे आवश्यक आहे. यातून कोरोनाचा शरिरात किती संसर्ग झाला आहे हे स्पष्ट होते. तसेच वेळोवेळी ऑक्सिजन लेवल तपासणेही गरजेचे आहे. जर बाधिताचे ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेउन रुग्णालयात स्वत:ला भर्ती करून घ्यावे असेही त्यांनी सांगितले. तसेच गृहविलगिकरणात असलेल्या बाधितांनी जास्त काळजी घेतली पाहीजे. कुटुंबातील इतर सदस्यांना बाधा होणार नाही अशी घरी व्यवस्था असेल तरच स्वत:ला गृहविलगिकरणात ठेवावे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.




Source link

Leave a Reply