शहरातील खासगी दवाखान्यात बेडची संख्या वाढवायला तात्काळ परवानगी द्या : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत


* चाचण्यांचे रिपोर्ट जलद गतीने मिळावेत
* आलेल्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करा
* कॅन्सर हॉस्पिटल जामठामध्येही उपचार
* झोपडपट्टी भागातील प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवा

नागपूर : जिल्ह्यात कोविडचा संसर्ग वेगाने फैलावत असून आरोग्य यंत्रणावर प्रचंड ताण येत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी व वाढीव बेडसाठी जिल्हयातील ज्या खासगी रुग्णालयांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत त्या रुग्णालयांना तात्काळ परवानगी द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोविड आढावा बैठकीत आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कायदा व सुव्यवस्था, रेमडेसिवीरची, बेडची संख्या वाढविण्याबाबत आढावा बैठक घेतली. केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्थेचा झोननिहाय आढावा घेतला. राज्य शासनाच्या नवीन निर्बधांची अंमलबजावणी करतानाच आवश्यक उद्योग व सेवेतील कामगारांना, तसेच लसीकरणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पोलीसांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. मात्र कोणतेही आवश्यक काम नसतांना विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी जिल्हयातील प्रमुख औषध विक्रेते व उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा केली. यामध्ये रुग्णांना शासकीय दरामध्येच रेमडिसीवर उपलब्ध करुन द्यावे. लोकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने औषध विक्रेत्यांनी मानवीय भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी झॉयडस, सिप्ला, हेड्रो, सनफार्मा, मायलन, मेट्रो मेडीकल एजन्सी या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. दरपत्रक जाहीर केल्यास पारदर्शकता येईल असेही त्यांनी सांगितले.

शासकीय, खाजगी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार झाला पाहिजे. यासाठी राष्ट्रीय कॅन्सर इंस्टीट्यूट जामठा येथे 200 नवीन बेड व एम्समध्ये 500 बेडची व्यवस्था करण्याबाबत तिथल्या संचालकांना निर्देश दिल्याचे ना. गडकरी म्हणाले. कोविडमध्ये नवीन रुग्णालय सुरु करण्यासाठी किंवा बेड वाढविण्यासाठी आवश्यक त्या परवानगी अशा प्रतिकुल परिस्थितीत तात्पुरत्या का होईना पण द्याव्यात, अशी सूचना ना. गडकरी यांनी केली. यावेळी लोकांनी सरकारी यंत्रणांवर असलेला ताण पाहता सहकार्याची भूमिका ठेवावी. आवश्यक कामाखेरीज घराबाहेर पडू नये, कोविड त्रिसुत्रीचा अवलंब करावा. प्रशासनाला सहकार्य करावे. प्रत्येकाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत असली तरी शेवटी प्रचंड मर्यादा येतात, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशन्टसाठी काही बेड राखीव ठेवता येतील का याचाही विचार करण्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील पकवासा आयुर्वेदीक महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व इएसआयसीच्या रुगणालयात कोविड रुग्णांसाठी वाढीव बेडसह डॉक्टर, नर्सेस अन्य आवश्यक स्टॉफची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. साथरोग प्रतिबंधक कायदाअंतर्गत प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची निर्देशही त्यांनी दिलेत. एमआयडीसी मध्ये बंद पडलेल्या ऑक्सीजन प्लॉन्टची तपासणी करुन तो लवकर सुरु कसा करता येईल याची चाचपणी करावी, असेही त्यांनी सांगितले. बेडची संख्या वाढविण्याबरोबरच आयुर्वेदीक, होमिओपेथीक, ॲलोपॅथी यातील पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचाही सहभाग घ्यावा, मेयो व मेडिकलच्या अधिष्ठातांनी त्यांना किती मनुष्यबळ आवश्यकता आहे याची मागणी नोंदवावी व सुयोग्य व्यवस्थापन करावे,सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक किंवा जे जे शक्य असेल ते करण्याची गरज आहे जेणेकरून नागरिकांचे जीव वाचवता येईल असेही सूचविले. शहरातील झोपडपट्यात संसर्ग वाढत असल्याने महानगरपालिकेच्या झोन अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घातले पाहिजे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनांचा आदर करुन त्यांची योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

शहरातील मेयो, मेडिकल व लता मंगेशकर या रुग्णालयात उपलब्ध क्षमतेत बेड वाढविण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. यामध्ये मेयोला साधारण 25 बेड वाढविण्याची व मेडिकलला 35 बेड वाढविण्याची क्षमता असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले.

जिल्हयात लसिकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी लसीचा साठा कमी पडत आहे त्यासाठी केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांनी केंद्राकडे पाठपुरावा करुन अधिक लसीचे डोस मिळवून द्यावे, अशी विनंती देखील पालकमंत्री डॉ. राऊत यांनी त्यांना केली.




Source link

Leave a Reply